आत्म्याला 'आत्माराम' बनवायचा निश्चय करा - 'One Point Loyalty' | Aniruddha Bapu Pravachan

Wed Mar 18 2026
Pravachans of Bapu

Aniruddha Bapu Pravachan

(Thursday 12th February 2026)


आत्म्याला 'आत्माराम' बनवायचा निश्चय करा - 'One Point Loyalty' | Aniruddha Bapu Pravachan | 12th February 2026

 

आपण मागे वळून आपल्या शालेय शिक्षणाचा विचार केला, तर आपल्याला आठवतात, शालेय गणिताचा अविभाज्य घटक असलेले पाढे (टेबल्स). शाळेत आपल्याला २ च्या पाढ्यापासून सुरुवात करून ३० पर्यंत पाढे शिकवले जातात. पण पाढे २ पासूनच का? ‘एक’चा पाढा का नाही, असा विचार आपल्यातील बहुतेक जण फारसा कधी करत नाहीत. सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या पितृवचनाची सुरुवात ह्याच मुद्याने केली.

 

२ चा पाढा सगळ्यात सोपा असल्याने तो लगेचच पाठ होतो. आपण ‘बे एके बे, बे दुणे चार,....’ पाढा घोकत शिकत जातो. पण बापूंनी इथे एक गंमतीचा भाग लक्षात आणून दिला की अनेक शब्दांना प्रथम ‘बे’ अक्षर जोडले, तर त्या शब्दाच्या मूळ चांगल्या अर्थाच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो - बेजबाबदार, बेकायदेशीर, बेईमान, बेअक्कल, बेसुमार, इ. म्हणजेच ‘बे’ अक्षर द्वंद्व दर्शवते - दुसर्‍याशी तुलना दर्शवते, ज्यामुळे आयुष्यातील बहुतांश प्रॉब्लेम्स सुरू होतात. त्याऐवजी आम्हाला ‘एक’चा पाढा पाठ करायला पाहिजे. कारण ‘एक’ म्हणजे सत्य. इथे सद्गुरु बापूंनी ‘वन-पॉईंट लॉयल्टी’ची, अर्थात ‘ ‘त्या’ एकालाच शरण जाणे’ ही संकल्पना समजावून सांगितली. जीवनात काही करून दाखवायचे असेल तर ‘वन पॉईंट लॉयल्टी’शिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठी ‘एक’चा पाढा यायला लागतो. असे बापूंनी ठासून सांगितले.

 

त्याचबरोबर, आयुष्यात भक्तिमार्ग हाच श्रेष्ठ आहे, इतर मार्गांत कमालीची अचूकता लागते, कडक नियम पाळावे लागतात व पतनभयही आहे. जो ही ‘वन पॉईंट लॉयल्टी’ अंगिकारेल, त्याच्या जीवनात ‘सुंदरकाण्ड’मधील -  ‘प्रभु की कृपा भयउ सब काजू। जन्म हमार सुफल भा आजू॥’ ही ओवी सत्य होते, असेही त्यांनी शेवटी सांगितले व श्रद्धावानांकडून ह्या ओवीचा गजरही करवून घेतला. तसेच ‘आत्मा’ म्हणून भगवंत सगळ्यांमध्ये असतोच, पण साक्षीभावाने असतो; जेव्हा त्याला ‘आत्माराम’ बनवून हृदयात ठेवाल, तेव्हा तो सक्रिय होऊन तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतो, हे सांगून, ही ‘वन पॉईंट लॉयल्टी’ प्रतिपादित करणारा एक अभंग शेवटी ऐकवला.