अतुलितबलधाम


बलप्राप्ती कोणाला नको असते? आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळविण्यासाठी उचित प्रयास करावेच लागतात व त्याकरिता शारीरिक व मानसिक अशा दोन्ही बलांची आवश्यकता असते. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या बलाचा इच्छुक असतोच व ते मिळविण्यासाठी ह्या ना त्या मार्गाने प्रयत्न करतच असतो. मात्र केवळ भक्तीमार्गातून मिळालेले बल ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही प्रकारच्या उद्दिष्टांची प्राप्ती करून देऊ शकते.


श्रद्धावानांना सहजतेने अशा बलाची प्राप्ती व्हावी ह्याकरिता सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने - श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ (खार, मुंबई), गुरुकुल (जुईनगर), गोविद्यापीठम्‌ (कोठिंबे-कर्जत), अतुलितबलधाम (रत्नागिरी), सद्गुरु श्रीपुण्यक्षेत्रम्‌ (अंमळनेर) अशा विविध ठिकाणी श्रद्धास्थानांची स्थापना केली आहे. त्यांतील ‘अतुलितबलधाम' हे एक आगळेवेगळे श्रद्धास्थान आहे. भक्तिमार्गावरील श्रद्धावानांचा आधार, मार्गदर्शक व आदर्श असणाऱ्या व अतुलित बलाने संपन्न असलेल्या श्रीपंचमुख हनुमंताची उपासना ह्या श्रद्धास्थानी केली जाते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या पंचगुरुंपैकी श्रीहनुमंत हा रक्षकगुरु आहे व ह्याचा उल्लेख सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजामध्येही केला आहे.


दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनस्थळी स्टेजवरील सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या आसनामागे कायम श्रीहनुमंताची तसबीर उभी असल्याचे आपण कित्येक वर्ष पाहत आहोत. कलियुगाच्या सध्या चालू असलेल्या घोर चरणामध्ये, श्रीहनुमंताच्या उपासनेचे महत्त्व आपल्याला सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितलेलेच आहे. तसेच ह्यापुढील सर्व काळासाठी, आपापल्या इतर नित्य उपासनांबरोबरच ‘श्रीपंचमुख हनुमत्कवच'चे जास्तीतजास्त पठण करण्यासही त्यांनी श्रद्धावानांना सांगितले आहे. कलियुगातील ही श्रीहनुमंताच्या उपासनेची आत्यंतिक गरज लक्षात घेता, ‘अतुलितबलधाम' हे श्रद्धास्थान म्हणजे श्रद्धावानांसाठी एक भक्कम आध्यात्मिक आधारस्तंभ बनले आहे ह्यात शंकाच नाही.


भगवान श्रीपरशुरामांच्या पावन भूमीत, अर्थात कोकणात रत्नागिरी येथे 6 जानेवारी 2002ला, सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या चिन्मय पादुकापूजनासहित अतुलितबलधामच्या भूमीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर केवळ 14-15 महिन्यांच्या कालावधीत ह्या धामाचे बांधकाम पूर्णही झाले. हे बांधकाम इतक्या विक्रमी गतीने पूर्ण होण्यामध्ये, अनेक श्रद्धावानांनी स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे दिलेल्या श्रमदानाचा सिंहाचा वाटा होता. दि. 8 ते 10 जुलै 2003 दरम्यान ह्या शक्तिपीठाची विधिवत्‌ स्थापना करण्यात आली.


ह्याच अतुलितबलधाममध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्याच कृपाशिर्वादाने समीरदादांच्या हस्ते 18 जून 2009 रोजी श्रीपंचमुख हनुमंताची स्थापना करण्यात आली. सदर मूर्ती अगोदर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या निवासस्थानी स्थानापन्न होती. तसेच सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने रत्नागिरी स्थित एक


श्रद्धावान, श्री.विजयसिंह भिंगार्डे ह्यांना प्राप्त झालेल्या ‘दिग्विजय पादुकांची' स्थापना अतुलितबलधाममध्येच करण्यात आली आहे.


अतुलितबलधाममध्ये होणारे दैनंदिन विधी:

1) सकाळी 8.00 वाजता श्रीपंचमुख हनुमंताचे पूजन केले जाते. त्यावेळी श्रीपंचमुखहनुमत्कवचम्‌ म्हटले जाते व श्रीहनुमंताच्या चरणांना शेंदूरचर्चन केले जाते.

2) दुपारी 1.00 वाजता श्रीहनुमंताला दूध व फळांचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर ‘सत्राणे उड्डाणे...', ‘आरती करितो हनुमंताची...' व ‘माते गायत्री...' ह्या आरती केल्या जातात.

3) रात्रौ 8.00 वाजता वरीलप्रमाणेच नैवेद्य व आरती होते, ज्यामध्ये ‘ॐ जय हनुमंत महाबल...' ही अतिरिक्त आरती केली जाते. आरतीनंतर श्रीहनुमानचलीसा, श्रीअनिरुद्धचलीसा व श्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्राचे प्रत्येकी एकदा पठण केले जाते.


मर्यादामार्गावर चालू इच्छिणाऱ्या श्रद्धावानांना अतुलित बल प्राप्त करून देणाऱ्या ह्या पवित्र श्रद्धास्थानामधील अन्य आध्यात्मिक स्थळे पुढीलप्रमाणे -

 

1) क्षेमकुंभ - हा एक जलकुंभ (विहीर) असून, 2001 सालच्या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी (10 जानेवारी 2002) ह्या क्षेमकुंभाला जलधारा प्राप्त झाली. 8 जुलै ते 10 जुलै 2003 या काळात ह्या विहिरीचे सुचितदादांनी ‘क्षेमकुंभ' असे नामकरण केले. ह्या क्षेमकुंभाचे पाणी बाराही महिने कधीही आटत नाही.

2) औदुंबर वृक्ष - 2003 सालच्या आषाढी एकादशीच्या दिवशी, म्हणजेच दि. 10 जुलै 2003 रोजी ह्या वृक्षाच्या मुळाशी चूडामणीची स्थापना करण्यात आली. त्यानंतरच्या नारळी पौर्णिमेला हा औदुंबर वृक्ष श्रद्धावानांकरिता दर्शनासाठी खुला करण्यात आला.

3) तुलसीवृंदावन - 2003 सालच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुलसी वृंदावनाची स्थापना करण्यात आली.

4) मुचकुंद वृक्ष


अतुलितबलधामास दर्शनाकरिता येणारे श्रद्धावान श्रीपंचमुख हनुमंताच्या समोर व द्विगविजय पादुकांसमोरील प्राकारात बसून स्तोत्रपठण, जप, वाचन करू शकतात. तसेच इथे श्रद्धावान ‘अन्नपूर्णा प्रसादम्‌' अंतर्गत अन्नदानही करू शकतात. विविध प्रकारचे सुदीप लावण्याची आणि अग्निहोत्रात ऊद अर्पण करण्याची सुविधाही श्रद्धावानांकरिता उपलब्ध आहे.


दि. 16 मे 2016 रोजी अतुलितबलधामाच्याच वास्तूत पहिल्या मजल्यावर ‘श्रीत्रिविक्रम मठाची' स्थापना झाली. इतर श्रीत्रिविक्रम मठांप्रमाणेच श्रद्धावान ह्या मठात बसून कुठलाही जप वा अध्यात्मिक वाचन करू शकतात. जीवनात स्थैर्य व शांति प्राप्त करण्याकरिता श्रीत्रिविक्रम मठाचे दर्शन घेण्याचा लाभ श्रद्धावान घेऊ शकतात.


अतुलितबलधाममध्ये होणारे विशेष साप्ताहिक, वार्षिक कार्यक्रम/उत्सव -

दररोजच्या पूजनाबरोबरच अतुलितबलधाममध्ये अनेक विशेष साप्ताहिक, वार्षिक कार्यक्रम/उत्सवही साजरे केले जातात. ह्यांमध्ये -

1) दर रविवारी सकाळी 9.30 वाजता 108 वेळा घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण केले जाते.

2) वर्षातून 3 वेळा, म्हणजे अनुक्रमे आषाढी एकादशी, श्रीरामनवमी व श्रीविजयादशमी ह्या दिवशी श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्राचे 108 वेळा पठण केले जाते.

3) त्याचबरोबर प्रतिवर्षी आषाढी एकादशी (वर्धापनदिन), गुरुपौर्णिमा, अनिरुद्धपौर्णिमा, तसेच चैत्र महिन्यात हनुमानपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो.


हनुमानपौर्णिमा उत्सवाच्या वेळी, सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी स्वहस्ते साकारलेली (घडवलेली) श्रीहनुमंताची शिळा गुरुकुल (जुईनगरहून) खास आणली जाते. ऊसाच्या मखराच्या सजावटीमध्ये त्या शिळेची स्थापना केली जाते व पूजन केले जाते. हनुमानपौर्णिमेच्या दिवशी ‘श्रीपंचकुंभाभिषेक' केला जातो. त्यात प्रत्येक श्रद्धावान सहभागी होऊ शकतो. ह्या ‘श्रीपंचकुंभाभिषेकाकरिता' आगाऊ नोंदणी करण्याची संधीही श्रद्धावानांना प्राप्त आहे. खाली दिलेल्या लिंकद्वारे श्रद्धावान ह्या पूजनाची आगाऊ नोंदणी करू शकतात. ह्या वर्षीचा उत्सव मंगळवार, दि. 23 एप्रील 2024 रोजी संपन्न होणार आहे.

https://poojanarchanseva.shreemadpurushartha.com


ह्या उत्सवाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर ‘ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः' ह्या श्रीहनुमंताच्या महामंत्राचा अखंड जप सुरू असतो. तसेच ‘संकटमोचन श्रीहनुमान स्तोत्र' आणि ‘पंचमुखहनुमत्कवचम्‌' ह्या स्तोत्रांचेही विशिष्ठ अंतराने दिवसभर पठण केले जाते. रात्रौ 10.00 वाजता पूर्णाहूती दिली जाते व कार्यक्रम संपन्न होतो.


असे हे आपले ‘अतुलितबलधाम'! सर्व श्रद्धावानांचा आधारस्तंभ असणारा श्रीहनुमंत आपल्या जीवनातही सक्रिय व्हावा, अशी श्रद्धावानांची इच्छा असते. प्रारब्धरूपी रावणाविरुद्धच्या लढाईत, भक्तिरूपी सीतेचा शोक दूर करणारा, पुरुषार्थरूपी राम व त्यागरूपी लक्ष्मणाचे संरक्षण करणारा श्रीहनुमंत एकदा का आपल्या जीवनात सक्रिय झाला की मग तो श्रद्धावानाला ‘वानरसैनिक' बनवून रामाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जातो. अशा ‘अतुलित बलाचे धाम' असणाऱ्या साक्षात श्रीहनुमंताची भक्ती करण्याची व त्याला आपल्या जीवनात सक्रिय करण्याची सुवर्णसंधी ह्या अतुलितबलधाम श्रद्धास्थानामुळे श्रद्धावानांना मिळालेली आहे.